छत्तीसगढमध्ये चकमकीत २७ नक्षलवादी ठार   

मृतांमध्ये म्होरक्या बसवराजू याचा समावेश

नारायणपूर : छत्तीसगढच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत २७ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये नक्षलवादी नेता नंबला केशव राव उर्फ बसवराजू याचा समावेश असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले.
 
मागील तीन दशकांत प्रथमच नक्षलवादविरोधी लढ्यात सुरक्षा दलाने सीपीआय-माओवादीच्या सरचिटणीसाचा खात्मा केला, असे शहा यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या कारवाईबद्दल शहा यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केलेे आहे.मागील काही दिवसांत छत्तीसगढ, तेलंगणा आणि महाराष्ट्रात ५४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून ८४ नक्षलवादी सुरक्षा दलासमोर शरण आले आहेत. ३१ मार्च २०२६ पूर्वी देशाला नक्षलमुक्त करण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. नक्षल चळवळीचा कणा असलेल्या बसवराजू याच्या नावावर एक कोटीचे बक्षीस होते. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक दलाचा (डीआरजी) एक सदस्य ठार झाला. तर, काही जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
 
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलास ऐतिहासिक यश मिळाले. चकमकीदरम्यान बसवराजू मारला गेला. तसेच, तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सरचिटणीस होता.नारायणपूर-विजापूर-दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात ही चकमक उडाली, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
 
नक्षलवादविरोधी मोहिमेदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव येथील जिल्हा राखीव रक्षक दलाच्या (डीआरजी) जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मागील दोन दिवसांपासून हे पथक नक्षलवाद्यांच्या मागावर होते. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. यासोबतच, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
या कारवाईत डीआरजी पथकाचा एक जवान शहीद झाला. तर, काही कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
या परिसरात शोध मोहीम अद्याप सुरू आहे, असेही ते म्हणाले. या कारवाईत नक्षलवादी संघटनेचे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते ठार झाले, असे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांच्याकडे गृहखात्याचादेखील कारभार आहे. छत्तीसगढमध्ये विविध कारवाईत यंदाच्या वर्षी २०० नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी, १८३ नक्षलवादी बस्तर विभागात ठार झाले. 
 

Related Articles